
शेगांव : विदर्भाची पांढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा ‘श्री’चा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह आज २ जून रोजी सकाळी प्रस्थान केले. श्रींच्या पालखीचे हे ५६ वे वर्ष असून या पालखी सोबत ७०० वारकरी एकूण १२७५ किलोमीटरचा विठ्ठलाच्या जयघोषात २ महिन्यात पूर्ण करणार आहेत. पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतांना गावातील हजारो नागरिक गावाच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी आले होते.

संपुर्ण राज्यभरातून आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे. शेगाव येथील श्री गजानन संस्थानचे हि १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी खंड न पडता सुरु आहे. यावर्षी पालखीचे हे ५६ वे वर्ष असून या दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्वांचा लोकांना बोध होतो. व आध्यात्मिक कार्य गतीमान होवून धर्माप्रती श्रध्दा व भावना वृध्दीगंत होतात. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत. श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत ७२५ कि.मी. आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते

शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटर आहे. असा एकुण प्रवास १२७५ किलोमीटरचा आहे. श्रींच्या पालखीला शहरातील श्रींचे प्रगटस्थळ, देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ, चहा देण्यात येतो. तद्नंतर श्रींची पालखी आज सोमवार २ जून ला श्री क्षेत्र नागझरीकडे प्रस्थान केले. संतनगरीतील हजारो भक्तगण आपल्या लाडक्या राजाला प्रेमाने निरोप देण्यासाठी पालखी सोबत होते. श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापानी व अल्पोपहाराची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती.*
श्रींच्या पालखीचे विशेष महत्त्व म्हणजे पंढरपुरात देखील विदर्भातील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या शिस्त, स्वच्छता आणि वारकऱ्यांबद्दल एक विशेष स्थान आहे. विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या पालखीचे पंढरपुरात देखील जल्लोषात व उत्साहात आगमन होताच स्वागत केले. श्रींच्या पालखीचा हा प्रवास आज 2 जून रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी पहिला मुक्कामअकोला जिल्ह्यातील पारस येथे राहणार आहे. परतीच्या प्रवास हा 10 जुलै रोजी सुरू होणार असून 31 जुलै रोजी शेगाव येथे आगमन होणार आहे.
